तिला लिहिलेली न दिलेली पत्रे ।।।
२
प्रिय ,
पुन्हा पत्र लिहीन याचा विचार केला होता पण तो योग इतका लवकर येईल असे वाटले नव्हते .
पण हा पाऊस म्हणजे एक विलक्षण आहे. त्याच्या कोसळणाऱ्या सरींमध्ये तुझी आठवण न यावी तर नवलच...
तो आपला कोसळतो हवा तेव्हा हवा तसा .पण त्याच्या प्रत्येक सरीत तुझी आठवण देऊन जातो . त्याचे काय पडल्यावर वाट मिळेल तिथे वाहत जायचे, प्रवाहात विलीन होऊन जायचे.
पण माझ्या मनात जागृत झालेल्या आठवन्नीचे, भावनांचे काय ? त्यांना जायला कुठे वावच नाही.त्या एकदा जागृत झाल्या की बाकी कशातच मन लागत नाही , नेहमी तुझाच विचार येत राहतो.आणि पाऊस पडून गेल्यावर पावसाचे पाणी रिते होऊन जाते तुझ्या आठवन्नीचे तसे कुठे आहे उलट प्रत्येक सरी गणिक त्या मजबूतच होत जातात.
पाऊस पडू लागला कि तो दिवस आठवल्या शिवाय राहत नाही , अर्थातच त्या दिवसात तुझे वास्तव्य होते म्हणूनच तो दिवस हृदयात अश्या प्रकारे कोरला गेलाय की पावसाचा एक थेंब ही त्याची आठवण आणण्यास पुरेसा आहे.
कंपनी च्या आत शिरताना पावसाचे येणे , आपली छत्री उघडून तुझी ब्याग आणि स्वतःला न भिजू देण्याची कसरत पाहण्यात एक वेगळीच मजा येत होती , त्या वेळी पाऊस आला म्हणून तुझ्या मनात राग नव्हता पण थोडासा उशिरा आला असता तर काय बिगाडले असते अशा प्रकारचे काहीतरी भाव तुझ्या चेहऱ्यावर होते.
तुझ्या त्या कसरतीत काही पाण्याचे थेंब जिंकले होते त्यांनी थेट तुझ्या चेहऱ्यावर आपली जागा बनवली होती, त्या टपोरया बिन्दू मुळे तुझा चेहरा अजूनच खुलून दिसत होता. तुझे ते गोंडस रूप तसेच्या तसे माझ्या मनात साठवून ठेवलेय आणि अशा पावसात ते रूप चेहऱ्या समोर आले म्हणजे सारे काही सुंदर भासू लागते.
चल थांबायला हवे आता ,पाऊस तर कधीचाच थांबलाय, माझ्या मनाचे तसे नाही ना , तुझ्या आठवणीत गुंतल्यावर त्यातून बाहेर पडणे म्हणजे एक दिव्यचं...
पुन्हा पत्र लिहीनच ...
तुझाच,