Tuesday, October 25, 2011

कोण आहेस तू ???

काय सांगू  कोण आहेस माझ्यासाठी  तू ...

माझ्या मनाला हवा असलेला सहवास तू ...
माझ्या उदास कळीला फुलवणारा सुहास तू ...
माझ्या प्रत्येक श्वासात निजणारा वास तू...
माझ्या जीवनाला वळण देणारी वाट तू ...
माझ्या हृदयात प्रेमाने तुंब भरलेल्या नदीचा काठ तू ...
माझ्या डोळ्यांतल्या आसवांचा आधार तू ...
माझ्या ओठांवर हसू फुलवणारा प्रेमळ श्वास तू ...
माझ्या मनात तरळणारे संगीत तू ...
मला स्वताशीच  मिळवून देणारा एक स्वप्नवत ध्यास  तू ...
माझ्या स्वप्नातली सुंदर परी तू ...


Friday, October 21, 2011

आयुष्य सुंदर आहे, जगणे शिकले पाहिजे !!!



आजचा अनुभव वेगळाच!!!
 थोडा विचार करायला लावणारा आणि खूप काही शिकवून गेलेला...

आज पूजाच्या आग्रहाखातर जत्रेला जायचा  योग आला( मनातून तसे जायचे नव्हतेच, शुक्रवारची संध्याकाळ पुढच्या २ दिवसांचे  प्लान्स आखायचे कि राहतो त्याच्या उलट दिशेला जाऊन काही वेगळे करावे हा एक दिव्य  प्रश्नच...) तर आम्ही हा ना करतच निघालो .

ज्या ठिकाणी जत्रा होती तेथे पोहोचलो,लहानपणी जत्रेमेध्ये सहभागी व्हायचो त्याची आठवण ताजी  झाली आणि सारे काही Flashback सारखे आठवू लागले (नाही म्हतले तरी ७-८ वर्षे झाली जत्रेला जाऊन विविध पाळण्यात बसून... ते ओरडणे ते हसणे आणि बरेच काही कुठे तरी हरवून गेले होते )

पहिल्या पाळण्यात बसलो, त्याचे एक वैशित्ये होते , तो कोणत्या क्षणाला कोणत्या दिशेला वळेल याचा काही नेम नाव्ह्था ते आम्हाला त्यात बसल्यावरच  कळले  ( आपल्या आयुश्याचेही  असेच नाही का ?  पुढच्या क्षणाला काय होईल कोणाला ठावूक म्हणूनच ते जगायला हवे आणि त्यातली अन्शितता अनुभवायला हवी, त्यातच खरी मजा नाही का?) तर आम्ही सर्वच वेड्यासारखे म्हणा  किव्वा लहान मुलासारखे म्हणा ओरडत होतो हसत  होतो, कोणी आम्हाला बघ्तेये आहाला बघून हस्तेये याचा थोडा ही विचार मनाला शिवला नाही फक्थ त्या गोष्टीची मजा अनुभवण्यात आम्ही बुडून गेलो होतो. पाळणा जेव्हा थांबला तेव्हा वेगळेच चयतन्य अंगात शिरल्या सारखे झाले होते.( या नजीकच्या  वर्षात मी कधी इतका हसल्याचा  ओरडल्याचा योगच आला नव्हता असे वाटत होते , त्या ओरड्ण्यातून जो काही राग, इर्षा आणि मनात जे जे काही वाईट होते ते सारेच निघून गेल्या सारखे वाटत होते आणि मन थोडे हलके झाल्याचा साक्ष्त्कार होत होता (इथे थोडी अतिशययोक्तीच झाली :-p पण चालते कधी तरी :-p) 

त्यानंतर योग आला तो आकाश पाळण्यात (Giant wheel ) बसण्याचा , त्यात बसण्याचा प्रत्येक वेळचा अनुभव वेगळाच पण पाळणा खाली येताना पोटात भीतीयुक्त  गोळा येतो तो क्षणच अवर्णनीय, त्या एका  क्षणात  भीतीही वाटते आणि तो पोटात येणारा गोळाही हवा हवासा वाटतो. आकाशात गेल्यावर आजूबाजूला गोल गोल  फिरणारे जग दिसू लागते सर्वच किती रम्य असते जणू आपण आकाशालाच  हात लावतोय असा भास होऊ लागतो, पाळण्याचा, इतरांच्या ओरडण्याचा आवाजही नाहीसा होतो मनात वेगळेच विचार तरळू लागतात आणि वेडे मन फुलपाखरासारखे बागडू लागते त्यातच वेळ संपलेली असते आणि मी जमिनीवर आलेला असतो.

महागाई वाढलीये त्याची झळ तेथेही लागली , पाळण्यात बसण्याआधी इतके पैसे? असे नाकही मुरडले पण पाळण्यातून उतरल्यावर जे अनुभवले ते त्या कवडीमोल रुपयांपेक्षा कितीतरी पटींनी "मोलाचे" होते. तो आनंद, मनाला वाटेल तसे ( लहान मुलाला शोभेल असे) वागणे , बागडणे या पुढे सारे काही गौणच...

हा अनुभव तुम्हाला सांगण्याचा उद्देश एकच की इतक्या लहान लहान गोष्टीत इतका मोठा आनंद सामावलेला असतो याचा आपल्याला धकाधकीच्या दुनियेत विसर पडलेला असतो. देव अधे मध्ये त्याचे प्रात्यक्षिक घडवून आपल्याला सिग्नल देत असतो पण आपणच त्या लहान गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्यातला मोठा आनंद गमावून बसतो. काहींना तर आनंद अनुभवायचे पण आहेत पण त्यात करण्या साठी त्यांचे हात मात्र साथ देत नाहीत मला त्यांना सांगावेसे वाटते एकदा आपल्या मनात आलेय मग ते नक्की करून पहा पैशाची चिंता बिलकुल करू नका  कारण त्यातून मिळणारा आनंद हा त्या पैशातून मिळणाऱ्या एशोआरामापेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे, ते अनुभवल्या शिवाय कळणार नाही.

(काही लहान गोष्टी ज्या मोठा आनंद देऊन जातात जीवनात )

समुद्र किनारी गेलात कपडांची पर्वा न करता भिजा पाण्यात, खेळा वाळूमध्ये , बनवा आपल्या स्वप्नांचे घर कोण आडवतय तुम्हाला ??? 

पाऊस पडतोय, जा भिजायला त्या साठी कसला मूड लागतोय ( तसे छत्री ब्यागेत ठेऊन मुसळधार पावसात भिजण्याची मजा काही औरच...)

आकाशात मस्त चांदणे पडलंय, जा गच्चीवर न्हाहून घ्या स्वताला त्या चांदण्यात, पैसे का लागतात त्यासाठी?

छान फुले फुलली आहेत त्यांचा सुगंध घायला कितीसा वेळ लागतो ??? 

आंघोळीच्या वेळी घ्यावे नाचून , गाऊन कोण मरायला येतेय तुम्हाला अडवायला.

सूर्योदय सूर्यास्त पाहण्यापासून कोणी अडव्लेय का तुम्हाला, करा व्यतीत  थोडा वेळ निसर्गाच्या सानिध्यात बघा थोडे त्याच्याशी बोलून.

भेट घ्या  मित्रांची जा  फिरायला त्यांच्याबरोबर हसा, खेळा बघा कसा वेळ निघून जातो ते किती आनंद मिळतो ते...

तर मग बघा हे सर्व करून ( वेळ मिळालाच तर  :-p) स्वताच्या आनंदासाठी थोडा वेळ काढणे तरी जमेल असे वाटते. काय मग शोधणार न छोट्या गोष्टीतला  मोठा आनंद... आणि जमलेच तर मला हि सांगा वरील गोष्टी व्यतिरिक्त तुम्ही कुठल्या लहान गोष्टीत  मोठा आनंद शोधला ते...

"स्वप्नं थांबवलीत तर आयुष्य थांबतं ,
विश्वास उडाला कि आशा संपते ,
काळजी घेणं सोडलं कि प्रेम संपतं..
म्हणून स्वप्नं पहा , विश्वास ठेवा आणि काळजी घ्या , आयुष्य खूप सुंदर आहे"

टीप : वरील ज्या लहान लहान गोष्टी आहेत त्या पूर्णपणे माझ्या नाहीत.( काही माझ्या वाचनात आलेल्या आहेत )
पुस्तकांचे आणि इतर वाचन जास्त प्रमाणात झाल्यामुळे डोक्यात थोडी उल्थापालात झाली आहे त्यामुळे  असे वेगळे विचार मनात येऊन आनंद शोधण्याचा प्रयत्न होतोय.

Saturday, October 1, 2011

एक अविस्मरणीय अनुभव...



वक्रतुंड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

लहानपणापासूनच  गणरायाला  माझ्या जीवनात एक वेगळे स्थान आहे...
जीवनाच्या प्रत्येक वळणावर त्याने मला साथ दिलीये असे वाटते, काही वेळा मला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी मी इतक्या सहजगत्या करू शकलो याचे सारे श्रेय त्यालाच जाते..
माझ्या अडीअडचणीच्या वेळी  त्यानेच  मला मदत केलीये सावर्लेय  आणि सुखांच्या वेळीही स्वतःचा विसर पडू दिलेला नाही...
या वर्षी गणपती दर्शनासाठी गावी जाणे झाले तिथे आलेला अनुभव तुम्हालाही सांगावासा वाटला म्हुनुनच ही धडपड... :-) :-) :-)


सुट्टीमध्ये गावी जाणे हे दरवेळी ठरलेले पण या वेळीचा कोकणातला आणि गणेशोत्सवाचा अनुभव काही औरच ...(एक आगळा वेगळा भक्ती भावाने भरलेला मंगलमय सोहळा )
या १० दिवसात एका वेगळाच विश्वात आल्यासारखे वाटत होते बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला असला तरी एक वेगळंच विश्व माझ्यावर सुखाचा पाऊस पाडत  होते.

प्रवासाला सुरुवात झाली तीच मुळी देव जणू परीक्षा घेतोय  ... ६-७  तासांत आपल्या Destination ला पोहोचणारी गाडी तब्बल १२ तास उशिरा पोहोचली.गाडीत असताना काही लोकांनी गावी जाण्याचा विचार सोडला आणि माघारी फिरले पण विग्न्हर्त्याचे  दर्शन झाल्याशिवाय मी मागे फिरणे शक्यच  नव्हते. उशिरा पोहोचल्याचा सारा थकवा ती मरगळ भालच्न्द्राला पाहून कुठल्या कुठे पळू गेली. लंबोदराची सुंदर देखनीय मूर्ती इतकी रेखीव होती कि मी थोडा वेळ माझे भान हरपून त्याकडे एकटक पाहताच राहिलो.आजीच्या "जेवून घे आधी " या वाक्याने मी भानावर आलो... सुखकर्त्यास वंदन करून मी पेट पुजेस बसलो पण डोळांसमोर ती मूर्ती अजून तरळत होतीच.




गावी असताना दिनक्रम ठरलेला सकाळी उठलो कि निसर्गाच्या सान्निध्यात  थोडा वेळ  व्यतीत  करण्यासाठी आणि त्याचे खरे सौदर्य अनुभवण्यासाठी एकटाच चालत फिरत राहायचो , निरनिराळ्या पक्षांचे  आवाज, मधेच येणारी  ती वाऱ्याची  झुळूक (सर्वांग  मोहरून टाकणारी) आणि  सृष्टीचे ते गोजिरवाणे रूप  मनाचा असे काही ठाव घायचे की दिवसभर असेच हुंदडत राहावे असे वाटायचे. 
सांजवेळ झाली कि सर्व आबाल थोर मंडळी आरती आणि भजनासाठी एकत्र जमत आणि प्रतेक्याच्या घरी जात.गावात घरे  मोजकीच पण एकमेकांपासून थोडी दूरच. मग रात्रीच्या काळ्या कुट्ट अंधारात हातात दिवा गळ्यात "टाळ" घेऊन एकामागून एक सगळेच रांगेत चालत राहू.पाय वाटेवरून एकंच माणूस चालू शकेल इतकी जागा आणि आजू बाजूला कमरेपर्यंत वाढलेली भात शेती , पाऊस अधून मधून हजेरी लावतच असायचा त्यातच रातकिडे आणि बेडूक आपण सर्वत्र पसरल्याची पावती देत असायचे.
मधूनच खळखळनाऱ्या झऱ्याचा आवाज ,त्यात पाय भिजल्यावर पायांनाच नव्हे तर मनाला मिळणारी प्रसन्नता अनुभवल्याशिवाय कळणार नाही.

पाच एक वर्षांपूर्वी जी गोष्ट( "भजन " ) मी टाळत असे त्या गोष्टीत मला इतकी रुची कशी वाटू लागली हे एक न उलगडलेले कोडेच आहे. "भजन " एक भक्तिरूप  सोहळा... त्या गाण्यात इतका अर्थ दडलेला असेल याचा यावेळी मला प्रत्यय  आला. "टाळ ", "तबला" आणि "पेटी" इतक्या माफक वाद्यांच्या तालावर सर्व भजन मंडळी (माझ्या सकट )बेभान होऊन गात राहू.(इतक्या माफक गोष्टींतून इतके सुंदर श्रवणीय संगीत निर्माण होईल याचा मी विचारही केला नव्हता ) "टाळांच्या" एकमेकांवर आदळण्याने जो ध्वनी (कंप ) निर्माण व्हायचा तो मनाला स्पर्शून जायचा आणि त्यामुळे मनाला एक प्रकारची प्रसन्नता मिळायची.(याच भजनातून माझा आवाज किती बेसूर आहे याचा प्रत्यय  आला पण 'देव भाव बघतो सूर नाही' असे मनाला समजावून बेभान होऊन गातच राहिलो. :-p)

जसा भजनात गुंग झालेलो तसाच "त्या" तिघींच्या हसण्यातही.त्यांच्या निरागस हसण्यातून मनाला मिळणारे नवच्य्येतन्य   , त्या सुंदर लेखाची आणि तो लेख लिहिणाऱ्या व्यक्तीची येणारी आठवण ... सारे सारेच किती रम्य  आणि प्रसन्न... त्यांचे ते  प्रसन्न हास्य टिपण्यासाठी आणि त्या नेहमी माझ्या दृष्टी समोर असाव्यात या साठी मनाची नेहमी धडपड होत असायची. त्या तिघींचे ते बोलके डोळे ,त्यांना भरपूर काही सांगायचेय असे नाहेमीच वाटायचे आणि आताही वाटतेय, त्या ते सांगू शकल्या नाही आणि मीही विचारू शकलो नाही पण त्यांच्या त्या हसऱ्या डोळांतील दुखः त्यांनी न सांगताच समजले...

माणसांबद्दल बोलायचे झाले तर पु. ल. नी "अंतू  बर्वा" चे वर्णन केल्या प्रमाणे कोकणातला माणूस हा फणसाप्रमाणे आहे पूर्ण पिकल्याशिवाय (वृद्ध झाल्याशिवाय ) त्याचा खरा गोडवा नाही समजायचा, मला त्यात थोडासा बदल करावासा वाटतो "कोकणातला माणूस फणसाप्रमाणेच आहे वरून जरी कठोर काटेरी असला तरी आतून रसाळ आणि मधुर नक्कीच आहे गरज आहे ती फक्त थोडे जवळून जाणून घ्यायची.( बरोबर आहे ना "यशवंत मोराजकर"  lol ).

विसर्जनाचा सोहळाही तेवढ्याच उत्साहाने साजरा झाला पण विसर्जनानंतर काही करावेसे वाटतच नव्हते,कशातच मन लागत नव्हते सर्व उत्साह विसर्जनासोबतच बुडाल्यासारखा वाटत होता.भजनाच्या वेळी "तू गेल्यावर पूजावे कुणाला " असे एक गाणे होते त्यावेळी जरी त्याचा इतका विचार केला नसला तरी त्याचा खरा अर्थ विसर्जनानंतर लागत होता आणि एक प्रकारची पोकळी निर्माण झालीये असे राहून राहून वाटत होते.

सुट्टीचे दिवस कसे संपले ते कळलेच नाही... निघायच्या आदल्या दिवशी परत जायचे हा विचारच करवत नव्हता. घड्याळाच्या काट्यावर फिरणारे जीवन माझी वाट पाहत होते.घरातून निघालो खरा पण मन अजूनही तिथेच रेंगाळत होते. काही तरी हातातून निसटतेय  असा भास होत होता.त्याच वेळी मनात पक्का विचार केला पुढच्या वर्षी पुन्हा यायचे आणि वेडे मन पुढच्या वर्षीच्या गजाननाच्या आगमनासाठी तयारही झाले ...

Note:
("त्या तिघी" बहिणी आहेत गावाला आमच्या घराच्या बाजूला राहणाऱ्या  आणि शाळेत जाणाऱ्या , लोकांचा उगीचच गैरसमज होतोय :-प )